गुरु, सद्गुरु आणि परमसद्गुरुचे न उलगडणारे रहस्य
I am a voice without form स्वामी विवेकानंदांच्या या वाक्यात एक गहन सत्य लपलेलं आहे. आश्वासन आहे. व्यक्तिगत चेतनेचा अंतिम अविष्कार म्हणजे ईश्वर. दगडही ईश्वर होण्याच्या मार्गावर आहेत. भारतातील अध्यात्मिक धारणा हीच आहे की ईश्वर निर्माण कर्ता यापेक्षा अस्तित्वाचा अंतिम कळस आहे. आपल्याकडे कळसाचही दर्शन घेतात. ते कदाचित त्याचंच प्रतिक असावं. बीजरुपातला तो ईश्वर कधीनाकधी उमलतो. मोगरा फुलला, मोगरा फुलला ! या अपरोक्षानुभूतिनंतर त्या सिद्धाच्या अस्तित्वाने आसमंत दरवळतो. इतरेतर सामान्यजन जे त्या उमलत्या अस्तित्वाच्या सान्निध्यात येतात तेही सुगंधीत होतात. त्यांनाही ईश्वर व्हायला तो मदत करतो. असा तो सद्गुरु हा प्रकट ईश्वर आहे.
गुरु तीन प्रकारचे- पहिला गुरु तो की जो विद्येची आस असणार्याला विद्येचे दान देतो. तो विद्यागुरु वा शिक्षक. हा केवळ ज्ञान देतो पण अस्तित्व नाही. तो मस्तकात केंद्रीभूत व्हायला शिकवतो. ‘जे जाणल्याने सर्वच जाणलं जाते ते शिकलास का ?’ पिता उद्दालक गुरुकुलातुन शिक्षण पूर्ण करुन घरी अंगणात प्रवेश करणारा आपला पुत्र श्वेतकेतुला हा प्रश्न विचारतो. तेव्हा त्याचं उत्तर मिळवण्यासाठी परत आश्रमात आलेल्या आपल्या विद्यार्थ्याची जिज्ञासा ऐकुन, अज्ञानाच्या एकाच नावेत बसलेले ते विद्यागुरु श्वेतकेतुपुढे केवळ विधीच सांगतात व आपण ते जाणत नाही आहोत ही प्रांजळ कबुली देतात. तेव्हा श्वेतकेतू ते जाणण्यासाठी जंगलात निघून जातो.
‘हि विद्या शिकुन मी काय करु ? केवळ पोटभरु असं बाह्य पदार्थ वा विषयांच्या ज्ञानापेक्षाही अधिक किंमतीचं ते मला जाणायचं आहे’ असं आपल्या मोठ्या भावाला शाळेत मी का जात नाही याचे कारण सांगणारे गदाधर वा रामकृष्ण परमहंस शैक्षणिक विद्येपेक्षा अधिक महनीय असं काही आहे हे जाणत असतात.
विद्यार्थी हा माहितीच्या शोधात असतो तर शिष्य रुपांतरणाच्या !
अधिक किंमतीचं, जे जाणल्यानं सगळंच जाणलं जातं ते शिकणं अधिक महत्त्वाचं आहे किंबहुना आयुष्याचं सार आहे आणि ते शिकवण्याची जबाबदारी घेतात ते सद्गुरु जे देह धारण करुन असतात.
‘होय ! मी त्याला पाहिलं आहे. जसं मी तुला बघतो अगदी तसंच. किंबहुना याही पेक्षा सुस्पष्टपणे. काय तुला त्याला बघायचंय ?’ असा आत्मविश्वास पूर्वक म्हणणारा साधु नरेंद्राने यापूर्वी कधीच बघितला नव्हता. आणि हा आत्मविश्वास सार्थ करणारा स्पर्श त्याला त्या गुरुकडुन मिळाला आणि आयुष्य बदललं. तो स्रोतापन्न झाला ! निर्विकल्प समाधी नंतर नरेंद्रनाथ हेच म्हणाले की ‘त्यांनी मला दाखवलं ! मी माझाच चेहरा बघितला !’ पुढे तोही पुढे त्याच सद्गुरुंच्या अढळस्थानी कारुण्यानं बसलाही. ते सद्गुरु म्हणजे रामकृष्ण परमहंस व तो नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद.
आम्हाला तुम्ही काही शिकवाल का ? असं एकानं रमण महर्षींना विचारलं तर ते म्हणाले, नाही ! मी शिकलेलं विसरायला लावतो ! असे सद्गुरु त्या बालकवत समर्पित शिष्याला त्याचं भान द्यायला उत्सुक असतात. त्यानं गोळा केलेला कचरा साफ करतात. त्याला त्याचाच चेहरा दाखवतात. असे सद्गुरु अस्तित्व देतात ज्ञान नाही. ते विकेंद्रित शिष्याला केंद्राकडे नेतात. ते मस्तकातून उपटून काढतात. दुसरीकडे पुनररोपण करतात. कदाचित ते सुरुवातीला पीडादायक असतं, ते उपटणं, पानं गळणं, मातीत मुळांचा जम बसणं सारं वेदनादायी, प्रसुती वेदने सारखं पण तो शिष्य वटवृक्ष होतो. त्याचा नवीन जन्म झाला कि तो द्वीज होतो. ब्राह्मण होतो! सॉक्रेटीस म्हणायचे मी सुईण आहे. आणि ते खरं आहे कारण सद्गुरु अहम च्या मृत्यु नंतर अस्तित्वाचे भान देणार्या नवीन जन्माच्या प्रसुतीत मदत करतात.
परीस आपणाऐसें करीना। सुवर्णें लोहो पालटेना।उपदेश करी बहुत जना। अंकित सद्गुरुचा॥दा.1-4-15॥ परिस लोखंडाचे सोने करतो पण ते सोने लोखंडाला सोनं बनवत नाही पण सद्गुरु कृपा झालेला उपासक मात्र अनेकांचा उद्धारकर्ता होतो.
पूर्वेषामपि गुरु: कालेनानवच्छेदात् ॥पातंजलयोग, समाधीपाद-26॥ अर्थात काळाच्या पलिकडे असल्यामुळे तो गुरुंचा गुरु आहे, परमसद्गुरु आहे. सद्गुरु जेव्हा देह त्यागतात तेव्हा काळाच्या पल्याडचं अस्तित्व होतात तेव्हा ते परमसद्गुरु होतात. ओंकारस्वरुप ! यातही काही जण परत परत जगाच्या कल्याणासाठी येतात तर काही कधीच येत नाहीत. त्यांचं महापरिनिर्वाण होतं. दिवा परत लावण्याची शक्यताच मावळते. जसे कृष्ण, बुद्ध, रामकृष्ण परमहंस, संत ज्ञानेश्वर, समर्थ, स्वामी विवेकानंद इ. परत परत येत आहेत. ‘मी दोनशे वर्षांनी परत येणार आहे !’ असे रामकृष्ण नरेंद्रनाथांना म्हणाले होते.
देहात असताना सद्गुरु जीवनमुक्त असतात, जागृत असतात, काळाच्या अभावाचा बोधही असतो. पण देहाला मर्यादा असतात निसर्गाच्या. भुक, तहान, झोप इ. एक जैवीक घड्याळ चालु असतं. पण एकदा देह त्यागानंतर मात्र परमसद्गुरुला या मर्यादा राहत नाही. रामकृष्ण परमहंसांच्या देहत्यागानंतर मां शारदा हातातील कंगण जे सौभाग्याचं लेणं ते काढायला जाते आणि रामकृष्ण सशरीर प्रकट होऊन मी केवळ देह त्यागला आहे, तू कंगण कधी कढु नकोस ! असं तीला सांगतात.
I am a voice without form असं जेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात तेव्हा ‘मी या परमसद्गुरु रुपात आहे’, हे आपणास सांगत आहेत. त्यांनी अनेक जन्म आपल्यासाठी घेतलेले आहेत. मग अशावेळी आपण कुठल्या जन्माची पुण्यतिथी वा जन्मदिन साजरा करायचा ? कृष्ण अर्जुनाला हेच सांगतात बहुनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन। तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप॥5॥ अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्। प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया॥6॥- हे अर्जुना ! माझे व तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते तुला नाही पण मला माहित आहे. मी जन्मरहित व अविनाशी असुनही सर्व प्राण्यांचा ईश्वर (परमसद्गुरु) असुनही प्रकृतीला स्वाधीन करुन आपल्या योगमायेने प्रकट होत असतो.
योगी अरविंद स्वत: सांगतात,‘अलिपुरच्या तुरुंगात योगाभ्यास करताना वेळोवेळी स्वामी विवेकानंद मला मार्गदर्शन करायचे.’ ते परमसद्गुरु योग्य व समर्पित उपासकाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. जरी त्यांनी शरीराचा त्याग केलेला असला तरीही.
तिबेटमध्ये कैलासपर्वतापाशी अशी एक जागा आहे जिथे वैशाखि पौर्णिमेला म्हणजे बुद्ध निर्वाणाच्या दिवशी पाचशे बौद्ध सद्गुरु एकत्र येतात व त्यांना मार्गदर्शनासाठी साक्षात बुद्ध प्रकट होतात. साधनाकाळात स्वामी विवेकानंदांनाही बुद्धांनी दर्शन दिलेले होते.
सद्गुरु काळ व अवकाश यात वावरत असतात, त्यांचे अशा प्रकारे परमसद्गुरुशी संवादही चालु असतो. कुठल्यातरी जन्मात ज्याला सद्गुरु मिळाले त्या उपासकाला जरी समाधी लाभली नाही, त्याने देह सोडून परत जन्म घेतला तरी त्याला प्रत्येक जन्मात सूक्ष्म मार्गदर्शन मिळत राहते. त्याला माहिती नसले तरीही. शेवटी एवढंच म्हणवासं वाटतं- म्हणौनि सद्गुरु वर्णवेना। हे गे हेचि माझी वर्णना। अंतरस्थितीचिया खुणा। अंतर्निष्ठ जाणती॥दा.1.4.31॥
जय हरी !
जय हरी !
लेखन सेवा - दामोदर प्र. रामदासी, पुणे