समानता व बंधुतेचा विश्वरुप भाव !
म्हणौनि असो ते विशेषे। आपणपेयासारिखे । जो चराचर देखे। अखंडित॥ज्ञाने. 6-404॥- जो ज्ञानी सदोदित आपल्यासारखेच, आत्मरुपाने सर्व चराचरात्मक जग पाहतो.
गीतेच्या 6 व्या अध्यायाच्या 32 व्या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानदेव सामाजिक समतेचे महत्त्व व सहजीवनाचे आध्यात्मिक रहस्य अधोरेखित करतात. हृदय गाभार्यात विठ्ठलाशी आलिंगन होताच कर्ताभाव राहत नाही. त्याचे भागवत आत्मनिवेदन होते, त्याच्या या अव्यभिचारी प्रेमामुळे तो वारकरी सगळीकडे जणू स्वत:चेच स्वरुप पाहू लागतो. वेद या अवस्थेला ‘यज्ञ’ तर अध्यात्मात याला भक्ति असे म्हणतात.
गुणातीत अवस्थेने सदेह राहून विश्वातील सर्व आकारात आपल्याच प्रेमरुप परमात्म्याची आपल्यासहित अनुभूति घेणे म्हणजे विश्वरुप होणे होय. निवृत्ती साधन कृष्णरुपे खुण। विश्वी विश्व पूर्ण हरि माझा॥निवृत्तीनाथ॥ अशी अवस्था लाभलेल्या वारकर्याच्या आचरणाला प्रेमळ, अहिंसामय म्हणावे. बाकी प्रकृतिअधीन सामान्य जीव हिंसा करत नसतील तरी त्या वृत्तिला हिंसेचा अभाव म्हणावे; अहिंसा नव्हे ! ही प्रेममयताच मुक्तिचे खरे द्वार आहे.
आपणचि विश्व जाहला। तरी भेदभावो सहजचि गेला। म्हणोनि द्वेषु ठेला। जया पुरुषा॥ज्ञाने.12-191॥
विश्वाप्रति हा भेदभाव पूर्ण नाहिसा होण्याकरता भक्तिची वारी करावीच लागते. आत्मज्ञानाच्या शिखरावर भक्तिचा कळस चढेपर्यंत ब्रह्मज्ञ पुरुषही अपूर्णच म्हणावे लागतात. तो कळस चढल्यावर विश्वप्रेम उफाळल्यावर संतांचा समत्वाने विहार चालू असतो.
भजनाची व्याख्या करताना समर्थ रामदासस्वामी म्हणतात- कोणी एक भेटो नर। धेड महार चांभार। राखावे तयाचे अंतर । या नाव भजन॥ आज 21 व्या शतकातही भारतीय मन मनुष्याला मनुष्य म्हणून नव्हे तर कुठल्यातरी जातीचा, समाजाचा म्हणून बघते. शिक्षण घेऊनही जातीचे कंगोरे अधिकच धारधार झालेले दिसतात. अशा लोकांना समर्थांसारखे संत सांगतात की ’जातीच्या चष्म्यातून बघताना ती भगवत्ता त्याच्याही हृदयात तितक्याच समर्थपणे उपस्थित असल्यामुळे त्याच्या अंत:करणाचे रक्षण करावे. अर्थात त्याला आदराने वागवावे. हेच खरे भजन आहे.’
स्वामी विवेकानंद म्हणतात- ‘हाय दुर्दैव ! देशाच्या गरीबाचा कोणी विचार करत नाही. तेच खरे देशाचे मेरुदंड आहेत. जे आपल्या परिश्रमाने अन्न निर्माण करतात. हे मेहतर आणि मजुर जर यांनी एक दिवसासाठी काम बंद केले तर शहरभर भयंकर स्थिती निर्माण होईल. पण त्यांच्याकडे सहानुभूतिने कोण बघतो ?’ अर्थात ही स्थिती बदलण्यासाठी भागवतपंथीय संतांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. समत्वाचा, बंधुतेचा भाव भागवतपंथात ठळकपणे अभिव्यक्त होताना दिसतो. माझ्यासारखाच तोही आहे याचा आनंद घेण्यासाठीच आनंदाची वारी आपण करायला हवी.
स्वामी विवेकानंद म्हणतात- ‘हाय दुर्दैव ! देशाच्या गरीबाचा कोणी विचार करत नाही. तेच खरे देशाचे मेरुदंड आहेत. जे आपल्या परिश्रमाने अन्न निर्माण करतात. हे मेहतर आणि मजुर जर यांनी एक दिवसासाठी काम बंद केले तर शहरभर भयंकर स्थिती निर्माण होईल. पण त्यांच्याकडे सहानुभूतिने कोण बघतो ?’ अर्थात ही स्थिती बदलण्यासाठी भागवतपंथीय संतांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. समत्वाचा, बंधुतेचा भाव भागवतपंथात ठळकपणे अभिव्यक्त होताना दिसतो. माझ्यासारखाच तोही आहे याचा आनंद घेण्यासाठीच आनंदाची वारी आपण करायला हवी.
जय हरि !