Tuesday, January 16, 2018

अपयश हे भाग्याचे लक्षणच आहे !

अपयश हे भाग्याचे लक्षणच आहे !
 
    की निमित्ते कवणे येके। ते सिद्धि न वचना ठाके। परी तेथिचेनि अपरितोखे। क्षोभावे ना॥ज्ञाने.2-269॥-

काही कारणाने ते कर्म सिद्धीस न जाता तसेच राहिले तर त्याबद्दल मनात असंतोष मानून खिन्न होऊ नये, त्रासून जाऊ नये.

    कारुण्यपुरुष ज्ञानदेवांची मॅनेजमेंट सूत्रे सामान्य जीवाला प्रेरीत व जागती ठेवतात. रोजच्या धकाधकीत पोटासाठी धावणार्‍या जीवाला वेगवेगळ्या युक्त्या सांगून त्याला यशाचा मार्ग दाखवत, त्याच्या आयुष्यात आनंद कसा प्राप्त होईल यासाठी सूक्ष्म युक्त्या शिकवतात. परमार्थ काय अन प्रपंच काय सगळाच Mind Game आहे. अपयश मिळताच त्या क्षणाला त्या जीवाची मानसिक स्थिती कशी आहे यावर पुढचे यश किती लवकर मिळेल हे अवलंबून असते. माणूस खचला तर यश लांबणीवर पडते. पण त्याच क्षणी उभारी मिळाली तर ध्येयाच्या दिशेने मन परत कामाला लागते. योग: कर्मसु कौशलम्। कर्माच्या त्या कुशलतेमध्ये, ध्यानमयतेमध्येच स्वत:शी योग जुळले जातात, स्वत:शी म्हणजेच परमात्म्याशी ! त्या योगात स्वत:विषयीचा, कार्याविषयीचा आदर वाढतो. माऊली फार मोठी गोष्ट सांगतात की यश जरी नाही मिळाले तरी कर्मामध्ये तल्लिन झालेले ध्यानमय चित्त ते कर्मरत राहते हेच मोठे यश मानावे. हिच Wining Situation आहे. कारण त्या चित्ताला त्यानिमित्ताने ध्यानमयतेचि स्थिती लाभत आहे. आचरता सिद्धी गेले। तरी काजाची कीर आले। परी ठेलियाही सगुण जहाले। ऐसेचि मानी॥ज्ञाने.2-270॥- आरंभिलेले कर्म शेवटास गेले तर उत्तमच पण संकटाने घेरले, अपुरे राहिले तरीही ते सफल झाले असे समज.
    शर्यत अजुन संपली नाही कारण मी अजुन जिंकलो नाही ! ध्येयाच्या दिशेने उचललेले कुठेलेही पाऊल यशस्वीच असते असा स्वत:बाबत सकारात्मक विचार महत्त्वाचा आहे. स्थिर, प्रगल्भ माणूस यश व अपयश याबाबत आतून समत्वच राहतो. अपयशाच्या वार्‍याने खचून फडफडणार्‍या अंत:करणाचा तो नसतो. ज्या चुकांमुळे यश मिळत नाहीये त्या चुकांना शोधून अधिक कुशलतेमध्ये स्वत:ला तो नेतो यातच यशाचे गमक आहे. किंबहुना अपयश मिळणे हे एक प्रकारे भाग्यलक्षणच आहे. कारण नव्याने चेतना त्या लक्षावर केंद्रित होते, ध्यानमयतेच्या प्रक्रियेत त्याच्या मेंदूच्या अनेक सुप्त शक्ति जागृत होतात. नऊशेनव्व्याण्णव वेळा अपयशी झाल्यावरच हजारव्यांदा एडिसनचा दिवा पेटला होता. आणि ती घटना जगासाठी भाग्यकारक ठरली होती. म्हणून विश्‍वमाऊली निक्षूण सांगते- तू योगयुक्त होऊनि । फलाशासंग टाकूनि। मग अर्जुना चित्त देऊनि। करी कर्म॥2-267॥- हे अर्जुना ! तू निष्काम कर्म करणारा होऊन व ध्येय मिळेल न मिळेल याचा विचार न करता मन लावून कर्मे कर. चित्त देऊनि ! हा माऊलींचा शब्द आपण मंत्रासारखाच चित्तात धारण करायला हवा. जय हरि !

अखंड प्रसन्न राहण्याचा सराव करुयात !

अखंड प्रसन्न राहण्याचा सराव करुयात !

देखे अखंडित प्रसन्नता । आथी जेथे चित्ता। तेथे रिगणे नाही समस्ता। संसारदु:खा॥ज्ञाने.2-338॥

जेथे मन सतत प्रसन्न, प्रफुल्लीत आहे, उल्हसित आहे तेथे संसार दु:खांचा प्रवेश होत नाही.

    परात्पर सद्गुरु ज्ञानदेव बुद्धि स्थिर करण्याच्या युक्त्या सांगत असताना हा महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडतात. रोजच्या आयुष्याचा झगडा करणार्‍याला परमात्मा स्वप्नवत वाटू नये, प्रत्येक कृतीमध्ये त्याचाच दिव्य आविष्कार होत राहावा यासाठी बुद्धिची स्थिरता महत्त्वाची आहे. पण असंख्य वाटांनी मनाची धाव होत राहते. धावणे होते पण पोहोचणे होत नाही. देव मंदिरापुरता व आनंद कल्पनेपुरता मर्यादित राहतो. चेतनेला पंख लाभत नाही व आनंदाला पारखा जीव जन्मोजन्मी परमार्थाच्या दरीवर संसाररुपी वृक्षाच्या पारंब्याला अधांतरी लोंबकळत राहतो. ना धड प्रपंच ना धड परमार्थ ! अशी स्थिती होत राहते. पण आनंदमय जीवन जगणे हा त्या जीवाचा निसर्गदत्त हक्क व अधिकार आहे. अशावेळी विश्‍वाचे अयथार्थ दर्शन होत राहिल्याने दु:खी झालेल्या त्या जीवाला यथार्थतेच्या महामार्गावर आणत असताना सर्वप्रथम प्रसन्नतेचा अभ्यास करण्याची युक्ती सांगतात. प्रसन्नतेच्या या अभ्यासाने माणूस परमार्थातात अग्रेसर राहतोच पण प्रपंचातही नेटकेपणा मिळून करंटेपण सांडून जाते. प्रसन्न व हसरा माणूस हवाहवासा वाटतो. व्यवहारातही अशा कपाळावरील तणावाच्या रेषा पुसलेल्या माणसालाच यश मिळते. त्याची कल्पकता वृद्धिंगत राहते. म्हणून तर आनंदमय अभ्यासाची संकल्पना आज शाळेतही रुजवली जात आहे.
    मन:प्रसाद: सौम्यत्वं ...(मनाची प्रसन्नता, शांत भाव) या शब्दात सतराव्या अध्यायात भगवंत मनाचे तप सांगतात. प्रसन्नता हा चित्ताचा भाग व्हायला हवा असे म्हणतात. आनंद का ढगफुटीसारखा एकदम कोसळत नसतो तर क्षणाक्षणाला त्याचा अभ्यास करत बुद्धि स्थिर करावी लागते. प्रत्येक कृतीमध्ये ध्यानमयता, अपेक्षाभंगाच्या क्षणी खिलाडीवृत्ती दाखवणे, झालं गेलं विसरुन पुढे पुढे जात राहणे, उगाच वादात वेळ दवडण्यापेक्षा क्षमा करत जाणे, चेहर्‍यावर स्मित भाव असणे, नकारात्मक विचार व व्यक्तिंपासून दूर राहणे, मेंदूत अनावश्यक कचरा न भरणे इ. सरावाने हळूहळू ही प्रसन्नता वाढत जाते.
 एका साधूला विचांरले की तुमची साधना कोणती ? तर ते म्हणाले,"मी सदरा घालतानाही त्या कृती इतका आनंद कुठल्याच कृतीत नाही या भावनेने घालतो. प्रत्येक क्षणाला प्रत्येक कृतीत असेच जगतो हिच माझी साधना आहे.' हाच तो प्रसन्नतेचा अभ्यास !
    ज्याप्रमाणे निवार्‍यातील दिव्याची ज्योत मुळीच हालत नाही त्याप्रमाणे प्रसन्न चित्तामुळे स्थिर झालेला पुरुष आत्मस्वरुपाचे ठिकाणी जडलेला असतो. असे माऊली प्रसन्नतेची महती सांगतात. म्हणून प्रपंच व परमार्थात यशासाठी प्रसन्न रहो यारो ! जय हरि !