Friday, September 14, 2018

फुकटचा मैत्री भाव !


    एक संन्यासी हिमालयातून चाललेला होता. त्याच्या डोक्यावर ओझे, दुपारची वेळ, कडक ऊन, घाम, थकलेले शरीर अशी त्याची अवस्था. त्याच्या समोर त्या पहाडात राहणारी लहान मुलगीही चाललेली होती. तिच्या खांद्यावर तिचा लठ्ठ, वजनदार लहान भाऊही होता. साधुला दया वाटून त्याने सहानुभूतीने त्या मुलीला विचारले, ‘मुली, खुप वजन असेल त्याचे, एवढे ऊन, कठीण चढ !’ त्या मुलीने हैराणीने त्याच्याकडे बघितले. म्हणाली, ‘हे आपण काय म्हणत आहात ? वजन तर तुमच्या डोक्यावर आहे, हा तर माझा छोटा भाऊ आहे !’ साधु स्वत:शी म्हणाला, "‘मी खूप शास्त्र वाचले पण असे अद्भूत वचन ऐकले नाही. मला पहिल्यांदाच कळाले की छोट्या भावामध्ये वजन नसते."’ हृदयातल्या प्रेमभावनेला वजन नसते. प्रेम वजनाला नष्ट करते. माणूस हलका होतो.
      छोट्या छोट्या कामांनाही वजनदार बनवता प्रेमाने हलके करता येईल.
      ध्यान अवस्थेनंतर अनुभवाला येणारी प्रगाढ शांती आणि गहन तृप्ती चे एकमेव कारण हे असते की आपण आपल्याबरोबरच जगताशीही तादात्म्य पावलेलो असतो. आपल्यातले चैतन्य जगतातले चैतन्य कळत नकळत एक झालेले असते. ध्यानावस्थेत आपण विराटाकडे झेप घेतलेली असते त्यामुळे ध्यानानंतर आपणहून समग्र जगताविषयी प्रेम व मैत्री वाटायला लागते. किंबहुना ध्यानापूर्वी जरी आपण थोडी जगत मैत्रीविषयी कल्पना केली तरी एक अद्भूत शांती अनुभवयाला येते.
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन। सुखं वा यदि वा दु:खं स योगी परमो मत:॥6-32॥- हे अर्जुन ! जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांना समभावाने पाहातो, तसेच सर्वांमध्ये सुख वा दु:ख समदृष्टीने पाहातो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो.
हा मैत्रीपूर्ण समत्वाचा भावच वैश्र्विक मैत्रीचे स्पंदन आहे.
म्हणौनि असो ते विशेषे। आपणपेयासारिखे । जो चराचर देखे। अखंडित॥6-404॥
या अखंडीत भावनेसाठी मात्र ध्यानात उतरायला लागेल.
      थोडी कल्पना करूयात वा प्रयोग करून बघुयात ध्यानाला बसल्यावर, रस्त्याने चालताना, उठताना, बसताना, एकांतात कुठेही सगळीकडे आपलेच प्रेमळ मित्र आहेत. वस्तु, व्यक्ती, पक्षी, वृक्ष, प्राणी सगळेजण आपले मित्र आहेत. मैत्री प्रेम आपल्याला परिव्याप्त करीत आहे. हा मैत्री धारणेचा प्रयोग सर्वात सोपा आहे.
      या प्रयोगानंतर आपल्याला चित्तामध्ये या मैत्रीभावनेमुळे आपोआप शांती येण्यास प्रारंभ होईल. जगताविषयीचा दुर्भाव अशांतीचे कारण आहे. विशेष म्हणजे रात्री झोपताना हा प्रयोग करून झोपाल तर सकाळी एका अभिनव शांतीसह आपल्याला जाग येईल. सकाळी उठल्यावरही या भावनेला पुन्हा जागवा. सतत चोवीस तासात जेव्हा स्मरण होईल या भावनेला प्रवाहीत होऊ द्यात.
      आपल्याला अनुभवाला यायला लागेल की आपल्या भोवतालचे समग्र जगतही आपल्यावर प्रेम करायला लागलेले आहे. आपल्याविषयी तेढ असणारे अचानक आपल्याशी प्रेमाने बोलायला लागलेले आहेत. कारण आपल्या संवेदनाही इतरांच्या अस्तित्वाला छेदून जातात. कुठेही जाताना आपल्या चैतन्याचे एक वलय घेऊन आपण फिरत असतो. आपले पॉझिटीव्ह, निगेटीव्ह तरंग इतरांना प्रभावीत करत असतात. बुमरँगसारखे सारे आपल्याकडे परत येत असते. त्यामुळे आपण सकारात्मक तरंग निर्माण केले पाहिजेत. यामुळे आपली अनेक कामे होतील.

No comments:

Post a Comment