Thursday, January 18, 2018

स्वत:च्या दिव्य अस्तित्वाचा स्वीकार

स्वत:च्या दिव्य अस्तित्वाचा स्वीकार
 
का पूर्ण कुंभ उलंडला। तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला। परी भानु नाही नासला। तयासवे॥ज्ञाने.2-41॥

पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यातील सूर्यप्रतिबिंब नाहीसे झालेले दिसते; परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर खरा सूर्य मात्र नाश पावलेला नसतो.

न जायते म्रियते वा कदाचिन्
नायं भूत्वा भविता वा न भूय:।
अजो नित्य: शाश्‍वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे॥20॥
वेदाविनाशिनं नित्यं य एन मज मव्ययम्
कथं स पुरुषं पार्थकं घातयति हन्ति कम्॥21॥

    प्रत्येक जीवाचे दिव्यत्व कधी न संपणारे आहे, चेतना नित्य, सनातन, न बदलणारी, अजन्मा, अमृत अशी आहे. गीतेतील दुसर्‍या अध्यायाच्या 20 आणि 21 व्या श्‍लोकावर टिका करताना, सिद्धांत समजावून सांगताना ज्ञानदेव हा दृष्टांत सांगतात.
    स्वत:च्या दिव्यत्वाचा अनुभव म्हणजेच उगमस्थानाकडे अर्थात वारकर्‍याचे विठ्ठलाच्या राउळात पोहोचणे होय. भक्तिच्या नादात व भावमग्न नृत्यात दिब्यत्व जागते. प्रत्येकजण प्रेमळ माऊली होतो. म्हणून प्रत्येक विनम्र, प्रेमळ वारकरी स्वत:हून माऊली माऊली म्हणत, एकमेकांचे दर्शन करतात. दिव्यत्व ठायी ठायी दिसू लागते. स्वत:च्या दिव्यत्वाच्या दिशेने केलेला हा आनंदमय प्रवासच पंढरीची वारी आहे. ‘स्व’ मताबाबत कट्टरपणा, अविवेकवाद जिथे जगात वाढताना दिसत आहे जसा मी दिव्य आहे तसा प्रत्येकजण दिव्यच आहे अशा संस्कारांचे, सूत्रांचे बालमनावर रोपण करणे आज काळाची गरज आहे. ज्याला स्वत:विषयी आदर आहे त्यालाच दुसर्‍याविषयी आदर असु शकतो. माझ्यासारखेच सगळे आहेत. हा समानता, बंधुत्वाचा संभावित विचार मेंदूच्या पेशींवर कोरला गेला तर जात, पंथ, प्रांताचा अहंम् मावळल्याशिवाय राहणार नाही. हा आंतरमनावर उमटलेला ठसा कार्यातही प्रतिबिंबीत होइल. ते कार्यही दिव्य होईल. कुशलतम् कार्य सर्व स्तरावर उंची वाढवेल. प्रगतिपूरक ठरेल. एखादी व्यक्ति ‘वारकरी’ होण्याची हीच प्रक्रिया आहे.
    आयुष्याच्या वाटचालीत पराभवाचे क्षण आल्यावर हत्या वा आत्महत्येचा नकारात्मक विचार शिवलेल्या, त्या खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी ही ओवी मंत्रासमान आहे. मी नाहिसा होईन वा मी कोणाला नाहिसा करेन असे म्हटल्याने काय चैतन्य नाहिसे होते ? विज्ञानाचा सिद्धांत आहे, जगात काही जन्मतही नाही वा नाहिसेही होत नाही केवळ रुपांतरीत होते. निसर्गाचा हा सनातन सिद्धांत आहे.
    उपनिषद काळातील ऋषी प्रथम मानवाच्या दिव्यत्वाची उद्घोषणा करताना दिसतात- श्रृण्वन्तु विश्‍वे अमृतस्यपुत्रा आ ये धामानि दिव्यानि तस्यु:। वेदाहमेतं पुरुषं महान्तमादित्यवर्णं तमस: परस्तात्॥श्‍वेताश्‍वेतर उपनिषद -2.5 व 3.8॥ मानवाला अमृताचे पुत्र (दिव्यत्वाचे अंश) म्हणून सन्मान देणारा हा भारतीय विचार यामुळेच जगात एकमेवद्वितीय ठरतो.
    स्वामी विवेकानंदांचे वाक्य आठवते. हे वाक्य मेंदूची भाषा व्हायला हवे. स्वामीजी म्हणतात-‘ईश्‍वराचे पुत्र तुम्ही ! तुम्ही अमृताचे अधिकारी, पवित्र, पूर्ण. तुम्ही या मर्त्यभूमीवरील देवता. तुम्ही पापी ? अशक्य ! मानवाला पापी म्हणणेच महापाप. विशुद्ध मानव आत्म्यावर तो मिथ्या कलंकारोप मात्र आहे. बंधुंनो ! तुम्ही सिंहस्वरुप असूनही स्वत:ला मेषतुल्य का समजता ? उठा मृगराजांनो उठा, आणि आपण मेंढरे आहोत हा वृथा भ्रम झाडून टाका. तुम्ही जरामरणरहित, मुक्त आणि नित्यानंदस्वरुप आत्मा आहा.’
हरि ॐ तत् सत्

No comments:

Post a Comment